मराठा आरक्षणावरून ५६ आंदोलने झाल्यानंतरच खरेतर राज्य सरकारला समाजातील अस्वथता समजायला हवी होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही आंदोलने शांततेने पार पडली यातच केवळ धन्यता मानली. सरसकट मराठा समाज सुबत्तेत असल्याचा समज करून देण्यात येत आहे. मराठवाड्यातील मराठ्यांची काय परिस्थिती आहे? दुष्काळामुळे जगता येईना, आरक्षणामुळे शिकता येईना असा शेतकर्यांच्या मुलासमोर प्रश्न आहे.
विकासाच्या संधी हव्यात
विकासाच्या संधी हिरावून घेतल्याचे खरेतर दुखणे सर्वच समाजासमोर आहे. आरक्षणाच्या मागणीकडे एका समाजाचा प्रश्न म्हणून पाहू नये. विकास करण्यात आपले राज्यकर्ते मागे पडले आहेत. प्रशासनातही खूप गतीची गरज आहे.
जातीची एकी प्रश्न सोडविण्यासाठी
कोणतीही जात असो त्यांच्यात एकी असायलाच हवी. या एकीचा वापर दुसर्यांना कमी लेखण्यासाठी करायची मुळीच आवश्यकता नाही. पण तसच घडते. जातीच्या संघटना नेहमी दुसर्या जातीबद्द्ल द्वेष करतात. त्यांचा संघर्ष जातीमधील गरिबी, बेरोजगारी विरोधात का असू नये. पण त्याबाबत जातीच्या संघटना का लढत नाहीत.